Breaking News
बंधुराज लोणे
संगणक क्षेत्रातील तांत्रिक सल्लागार माधव देशपांडे यांनी भारतीय निवडणूक आयोगावर गांभीर आरोप केले आहेत. सध्या वापरत असलेल्या EVM वर शंका घेण्यास वाव आहे, या मशीन्स तांत्रिकदृष्ट्या सदोष आहेत, या मशीन्स मध्ये हस्तक्षेप करून निकाल फिरविणे शक्य आहे, अशी खळबळजनक माहिती देशपांडे यांनी दिली आहे. या EVM चे कामकाज कसे चालते, त्याचे मेकॅनिझम कसे आहे, त्यात हस्तक्षेप कसा केल्या जाऊ शकतात याची अतिशय सविस्तर माहिती आणि अगदी सोप्या भाषेत देशपांडे यांनी अनेक मुलाखतीत दिली आहे. मतदान पार पडल्यावर निकाल जाहिर करण्यासाठी तीन दिवसाचा वेळ लागण्याची गरजच नाही, त्याच दिवशी निकाल जाहिर करणे शक्य आहे असे स्पष्ट करून या तीन दिवसात गडबड होण्याची शक्यता ते व्यक्त करतात.
प्रख्यात अर्थतज्ञ पराकला प्रभाकर यांनी लोकसभा निवडणुकीत मोदीला निवडून आणण्यासाठी निवडणूक आयोगाने काय भानगडी केल्या याबाबत अतिशय गंभीर आरोप केले. आता महाराष्ट्रातील निकालावर त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आह़े. एवढ्यावरच प्रभाकर थांबत नाहीत तर निकालातील हेराफेरीचे ठोस पुरावे ते देतात. लोकसभा निवडणुकीतील हेराफेरीवर खुलासा मागणारे अनेक पत्र, निवेदने त्यांनी निवडणूक आयोगाला पाठविले आहेत पण निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी त्यांचे घटनात्मक कर्तव्य तर सोडाच आपल्या निवेदनाची साधी दखलही घेतली नाही, अशी त्यांची तक्रार आहे.
तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल ही निवडणूक आयोगाची कमाल आहे असे प्रभाकर यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये एकदाच निवडणूक झाली. झारखंडमध्ये मतदान साधारणपणे एक टक्का वाढलेले दिसले. ते सहज शक्य आहे. 1952 पासून म्हणजे पहिल्या निवडणुकीपासून असे अल्प प्रमाण वाढलेले दिसले आहे. मात्र मोदी काळात हे प्रमाण सुमारे सात, आठ टक्क्यावरून वाढलेले दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींना साधारणपणे 76 जागा जास्त देण्यात आल्या आहेत. तर आता महाराष्ट्रात अचानक सुमारे सात टक्के मतदान वाढविण्यात आले आहे . मतदान पार पडल्यावर 5 वाजता, सहा वाजता मतदान टक्केवारी 58.22 असल्याचे जाहीर करण्यात आले. रात्री आणि दुसर्या दिवशी ही टक्केवारी 66.02 एवढी जाहिर करण्यात आली. वाढलेले हे मतदान सुमारे 77 लाख आहे. मतदान वेळ संपताना केंद्रावर असलेल्यांना सर्वांनाच मतदान करण्याचा अधिकार आहे. हे लक्षात घेतले तरी 77 लाख मतदारांनी वेळ संपल्यावर मतदान केले हे शक्य नाही, असा दावा करण्यात येत आहे.
एवढे मतदान अचानक कसे वाढले याचे उत्तर आयोगाने दिले पाहिजे. हरियाणामध्ये ही असेच मतदान वाढलेले होते . जिथे मतदान वाढ झाली त्या मतदारसंघात भा जा चा उमेदवार विजयी झाला आहे. 77 लाख मते भा ज प , मित्र पक्षाला वाढवून देण्यात आली अशी शंका प्रभाकर घेत आहेत आणि याचे उत्तर आयोग देण्यास तयार नाही. राजकिय पक्ष सोडा एक नागरिक म्हणून मला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे, असे प्रभाकर म्हनतात.
ही झाली एक बाजू आणि वस्तुस्थिती. मात्र याकडे मराठी विद्वान संपादक कुमार केतकर, गिरीश कुबेर, उदय निरगुडकर, सकाळचे प्रकाश पवार, ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे वैगरे सरळ दुर्लक्ष करतात. लोकमतच्या अतुल कुलकर्णीने असेच अकलेचे तारे तोडलेले आहेत पण त्याचे जाऊ द्या, त्याची दखल घ्यावी एवढी त्याची योग्यता नाही. प्रकाश पवार यांनीही मतदान घोळ लक्षात घेतला नाही. अपवाद फक्त निखिल वागळे. निखिल वागळे यांनी थेट आणि स्पष्टपणे सध्या देशभर जनतेत सुरू असलेल्या शंकेला आवाज दिला आणि हा निकाल एक तर चमत्कार किवा घोटाळा आहे , असा आरोप केला आहे .
इतर मराठी संपादकांची अशी दीड शहाण्याची शाळा सुरू आहे.
विधानसभा निवडणूक निकालाचे विश्लेषण करण्यासाठी बीबीसीच्या पत्रकाराने कुमार केतकर, गिरीश कुबेर, निखिल वागळे यांची मुलाखत घेतली तर प्रकाश पवार आणि उदय निरगुकरची यांची इतरांनी मुलाखत घेतली.समाजातील कोणत्याही स्तरातील जनतेला हा निकाल मान्य झालेला नाही. अगदी भा ज प च्या कट्टर समर्थकांनाही अशा निकालाचा अर्थ लावताना दमछाक होते आहे. त्यामुळे एवढ्या प्रचंड निकालाचे समर्थन करण्यासाठी अजून भा ज प आणि संघाची भक्त मंडळी बाहेर पडलेली नाहीत मात्र त्यापूर्वीच हे संपादक मात्र आपले दीड शहाणपण जाहीर करत आहेत.
लाडकी बहीण वैगेरे कथानक हे घोटाळा करण्यासाठी रचण्यात आले अशी शंका घेण्यास जागा आहे. मात्र कुमार केतकर यांना या भयावह विजयात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चुका दिसत आहेत. लाडकी बहिण योजनेचा कॉँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या महिलांनी योग्य प्रतिवाद केला नाही, एक विशिष्ट दिशा ठरविण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना अपयश आले असे निरीक्षण कुमार केतकर यांनी नोंदविले आहे. प्रश्न असा आहे की आज हा दीड शहाणपणा करणारे केतकर प्रचाराच्या काळात कुठे होते ? महाविकास आघाडीच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्यांना संपर्क करून काही मार्गदर्शन करण्यासाठी कुमार केतकरांना काय अडचण होती ? आपल्याला ज्या पक्षाने राज्यसभा दिली किमान त्या मीठाला तरी केतकर यांनी लक्षात ठेवायला पाहिजे होते.
गिरीश कुबेर यांनी काही प्रश्नांना हात घातला मात्र कुबेराच्या नजरेतही महायुतीचा निकाल हा लाडकी बहिण, योग्य नियोजन आणि संघाची सक्रियता वगैरेचे फलित आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून धडा घेतला आणि आपल्या डावपेचात सुधारणा केली असेही एक कारण कुबेराने दिले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना दोष देण्यात कुमार केतकरांसारखेच कुबेरही मागे नाहीत. निखिल वागळे यांनी आपला संताप व्यक्त करताना आता आपला या व्यवस्थेवर विश्वास उडाला आहे, असे सांगितले आणि जनतेने उठाव केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनाही निखिल वागळे यांनी धारेवर धरले आहे. आता खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणाची असा प्रश्न गिरीश कुबेर यांना विचारला तर त्याचे ते गोलमाल उत्तर देताना. केतकर, कुबेर आणि निखिल वागळे यांनी या निवडणुकीतील प्रचंड पैशाच्या खेळाकडे बोट दाखविले आहे. निखिल वागळे यांनी सुमारे चार हजार कोटी रुपयाचे कंटेनर गुजरात मधून आल्याची शंका व्यक्त केली.
प्रकाश पवार यांनी थोडी वेगळी माहिती दिली. पवार यांच्या मते भा ज प च्या पाच पदरी हिंदुत्ववादी राजकारणाने मोठी कामगिरी केली आहे. याला छेद देणे महाविकास आघाडीला जमलेले नाही. महाराष्ट्रात सध्या 60 टक्के बहुजन समाजाचे कट्टर म्हणता येईल असे हिंदूकरण झाले आहे. चर्चा व्हायला पाहिजे असे बरेच मुद्दे पवार यांनी मांडले आहेत.
उदय निरगुडकर तर छुपे संघवाले आहेत त्यामुळे ते काही ग्रेट विश्लेषण करण्याचीच शक्यता नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मराठवाड्यात भा ज प चा छुपा प्रचार केला होता. अर्थात संघ परिवार त्यांच्या समर्थकाना असे काम देत असतो, ही हुशारी पुरोगामी समजल्या जाणार्या नेते , पक्षाना जमत नाही किवा तशी त्यांची समज नाही. एकीकडे देशभरातील अनेक मान्यवर, संपादकांनी या निकालाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकशाहीत व्यवस्था निवडणूक आयोग आणि संघ परिवाराने धुळीस मिळवली आहे असा टाहो देशभरात फोडला जात असताना महाराष्ट्रातील संपादक, विचारांत, साहित्यिक, कलाकार शेपूट घालून बसले आहेत, सामान्य माणूस प्रश्न विचारात असताना हे दीड शहाणे संघ परिवाराच्या ब्राम्हणी राष्ट्र निर्मितीच्या षडयंत्र मोहिमेत मूकपणे सामील आहेत.
रिपोर्टर